मानोरा प्रतिनिधि मनोज आडे
स्वच्छता व नागरिकाच्या आरोग्याकडे ग्रापं प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे आरोप तालुक्यातील नागरिकांना दर्जेदार पायाभूत सुविधा मिळाव्या, नागरिकांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्य अबाधित राहावे यासाठी केंद्र व राज्य शासनाच्या अनेकविध योजना असून स्वच्छ भारत मिशन अभियानांतर्गत लक्षावधी रुपये मंजूर होऊनही भ्रष्टाचारामुळे निकृष्ट रित्या बांधलेल्या शेंदुरजना अढाव येथील शौचालयाच्या पाडकामाला सहा महिने होऊनही नवीन शौचालय बांधकामाला मुहूर्त मिळालेले नसल्याने शासनाकडून मिळालेल्या पैशाचा वापर नागरिकांच्या आरोग्यासाठी होणार की नाही असा सवाल यानिमित्ताने आता पुढे येत आहे. शेंदुरजना अढाव अंतर्गत येत असलेल्या बारा नंबर परिसरामधील अंगणवाडी मधील शौचालयाकरिता २ लक्ष रुपये आणि सार्वजनिक शौचालय उभारणीसाठी १८८००० हजार रुपये शासनाकडून मंजूर करण्यात येऊन डिसेंबर ०२४ मध्ये शौचालयाचे बांधकाम करण्यात आले होते ज्यामध्ये गंभीर अनियमित्ता करण्यात आल्याची तक्रार झाल्याने पं.स. स्तरावरून चौकशी करण्यात येऊन निर्माणाधीन शौचालय बांधकाम पाडण्यात आले होते. निर्माणाधिन शौचालयाच्या पाडकामाला जवळपास सहा महिने लोटूनही दोन्ही ठिकाणाच्या नवीन व दर्जेदार बांधकामास कधी मुहूर्त मिळेल असा प्रश्न या ठिकाणी निवास करीत असलेल्या नागरिकांकडून प्रशासनाकडे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांकडे उपस्थित केल्या जात आहे.
